Twisha Sharma Latest News: अभिनेत्री आणि मॉडेल ट्विशा शर्माच्या निधनानंतर तब्बल १२ दिवसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीतील एम्समधून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने आज दुपारी तिचे दुसरे शवविच्छेदन केले. त्यानंतर संध्याकाळी भोपाळमधील भदभदा घाट मुक्तिधाम येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याचवेळी फॉरेन्सिक विभागाने तिच्या सासरी तसेच पती समर्थ सिंह यांच्या घरी जाऊन तपासासाठी पुरावे गोळा केले.
सोमवारी संध्याकाळी ट्विशाचा अंत्यविधी अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडला. एम्स भोपालच्या शवागाराबाहेरतिच्या वाहिनीने हिंदू संस्कारांनुसार ट्विशाच्या पार्थिवाला सजवले आणि तिला लाल वधूवेष परिधान केला. कुटुंबीयांचा आक्रोश आणि अश्रूंनी वातावरण भारावून गेले होते. उपस्थित नातेवाईक त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते.
हेही वाचा: कॉक्रोच जनता पार्टीबाबत अण्णा हजारेंचा सरकारला सल्ला; म्हणाले की…
भावांनी दिला अखेरचा निरोप
ट्विशाच्या अंत्यसंस्कारातील सर्व विधी तिचे भाऊ हर्षित आणि आशिष शर्मा यांनी पूर्ण केले. काही महिन्यांपूर्वी मुलीला आंनदाने सासरी पाठवण्याऱ्या आई- वडिलांवर आता तिच्या अंत्यसंस्काराची वेळ आली. दुःखाने व्याकुळ झालेल्या भावांनी अश्रूंनी निरोप देत पार्थिवाला मुखाग्नी दिला.
आईची हृदयद्रावक अवस्था
अंत्यसंस्कारावेळी ट्विशाची आई वारंवार बेशुद्ध होत होती. मुक्तिधाम परिसरात ती अत्यंत खचलेल्या अवस्थेत दिसून आली. कुटुंबातील महिला तिला सावरण्याचा प्रयत्न करत होत्या. पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर आईने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी हात जोडून आपल्या मुलीला अंतिम निरोप दिला.
समर्थच्या वकिलांची प्रतिक्रिया
ट्विशाचे पती आणि या प्रकरणातील आरोपी समर्थ सिंह यांचे वकील ज्ञानेंद्र शर्मा यांनी सांगितले की, १२ मे रोजी ट्विशाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आल्या. सध्या हे प्रकरण सीबीआयच्या तपासाखाली असून दुसरे पोस्टमॉर्टेम करण्यात आले आहे. कुटुंबाला यावर कोणतीही हरकत नसून सत्य बाहेर यावे अशी त्यांची अपेक्षा आहे.
समर्थ सिंह यांची जामीन याचिका फेटाळण्यात आली असून त्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पुढील सुनावणी आणि प्रक्रिया जबलपूरमध्ये सुरू असल्याचे वकिलांनी सांगितले.
याशिवाय गिरिबाला सिंह यांच्या जामिनाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याचेही त्यांनी नमूद केले. कुटुंबाने हुंडाबळीचे आरोप फेटाळून लावत ते पूर्णपणे खोटे असल्याचा दावा केला आहे. दोन्ही कुटुंबे सुशिक्षित आणि प्रतिष्ठित असल्याचे सांगण्यात आले. ट्विशा आणि समर्थ यांची ओळख एका विवाह संकेतस्थळावरून झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.












