Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले असून ते उद्यापासून (३० मे) अंतरवाली येथे उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, सरकारकडून शिष्टमंडळानी भेट देत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण आंदोलनावर ठाम असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला.
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर पुन्हा एकदा आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange) हे उद्यापासून (३० मे २०२६) अंतरवाली येथे उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे.
दरम्यान, सरकारकडून जरांगे यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. शिष्टमंडळ अंतरवालीत दाखल झाले असून चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा: डिसेंबरपर्यंत शनीची उलटी चाल; ‘या’ राशींसाठी पुढील काही महिने ठरणार कठीण
विखे पाटील यांनी दिली माहिती
सरकारच्या वतीने कुणबी प्रमाणपत्र (Kumbi Pramanpatra) देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित SOP तयार करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्र वितरण सुलभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत राज्यभरात सुमारे ५८ लाख नोंदी आढळून आल्या असून त्यापैकी १२ लाख प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. मराठवाड्यातच ३ लाखांहून अधिक दाखले देण्यात आले असल्याची माहिती आहे.
तथापि, काही ठिकाणी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रमाणपत्र देण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जनजागृतीसाठी गाव पातळीवर समित्या गठित करण्यात आल्या आहेत, मात्र काही ठिकाणी त्यांचे काम समाधानकारक नसल्याचे दिसून आले आहे.
आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबतही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एकूण ६६८ पैकी ५६७ गुन्हे मागे घेण्यात आले असून उर्वरित प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री स्तरावर या विषयाचा सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
वेट अँड वॉच’ची भूमिका
दरम्यान, हैदराबाद गॅझेट (Hydrabad Gazette) प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे सरकारने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. मात्र, प्रमाणपत्र वितरण थांबवण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जरांगे यांनी शिंदे समितीच्या कामावर प्रश्नचिन्ह
जरांगे यांनी शिंदे समितीच्या कामावरही प्रश्न उपस्थित करत, राज्यात सापडलेल्या नोंदींबाबत अधिक स्पष्टता मागितली आहे. त्यांनी सरकारकडून ठोस भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
आता जरांगे यांच्या उपोषणामुळे आंदोलनाला पुन्हा धार येण्याची शक्यता असून, सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यातील पुढील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












