UDID Scheme: राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेत मोठा दिलासा दिला आहे. वैश्विक ओळखपत्र (UDID) नसल्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे अनुदान थांबले होते, ते पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या निर्देशानुसार UDID कार्ड मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत पात्र लाभार्थ्यांचे अनुदान सुरूच ठेवले जाणार आहे.
हेही वाचा: मनोज जरांगे आज अंतरवाली सराटीत बैठक घेणार; मराठा आरक्षणावरून पुन्हा संघर्षाची शक्यता
आधी अनुदान का थांबले होते?
राज्यातील विविध सामाजिक सुरक्षा योजनांसाठी UDID कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना आणि इतर केंद्र व राज्य पुरस्कृत योजना समाविष्ट आहेत. कार्ड नसल्याचे अनेक लाभार्थ्यांचे अनुदान तात्पुरते बंद झाले होते.
सरकारचा नवा निर्णय
सरकारने आता स्पष्ट केले आहे की १ एप्रिल २०२६ पूर्वी योजनेचा लाभ घेत असलेल्या दिव्यांगांचे अनुदान थांबवले जाणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांना जुन्या वैद्यकीय प्रमाणपत्रधारकांना UDID कार्ड मिळवून देण्यासाठी आवश्यक मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच १५ जून २०२६ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांनी स्वावलंबन पोर्टलद्वारे UDID साठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
विशेष मोहीम आणि सुविधा
आधार आणि UDID माहितीतील तफावत दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी दिव्यांगांसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण प्रक्रियेवर नियमित आढावा घ्यावा, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.












