Sunil Tatkare Chhagan Bhujbal clash : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्षात काय शिजतंय ते कोणालाच समजाला मेळ नाही. या ना त्या कारणामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर येत आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन मोठ्या नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर शब्दिक वार केल्याचे समोर आले आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांची बैठकीला गैरहजरी खूप काही सांगून जात आहे.
पक्षातील वरिष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर सर्वच बाजूंनी जोरदार टीका होत आहे. तर तांत्रिक चुका दाखवत त्यांची पदही पक्षाच्या काही याद्यांमधून गायब झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक वादळी ठरली. या बैठकीला प्रफुल पटेल हे काही कारणांनी गैरहजर राहिले तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आक्रमक पद्धतीने त्यांची बाजू मांडल्याने भुजबळ व त्यांच्यात संघर्ष झाला.
पक्षातून आणि बाहेरून जोरदार हल्ले होत असताना आमच्या पाठीशी पक्षातील कोणीही उभे राहिले नाही. आमच्या बाजूने बोलायला कुणी समोर आले नाही अशी व्यथा त्यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मुद्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि तटकरे यांच्यात खडाजंगी झाल्याचे समजते. तर माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी वाद झाला नसल्याचे सांगितले. आपण त्यांना केवळ आवरतं घेण्यास सांगितल्याची माहिती त्यांनी दिली. तर त्यानंतर छगन भुजबळ हे भाजपच्या एका नेत्यासोबत असल्याची माहिती समोर आली आहे.
2029 च्या निवडणुकीत भाजप काय भूमिका घेईल माहिती नाही. त्यापेक्षा आपण 288 जागांची तयारी करायला हवी. तसेच मतदारसंघ वाढत असतील तर त्याबाबत देखील आगामी प्लानिंग करायला हवी. सध्या राबवण्यात येणारी विशेष मतदार यादी पुर्ननिरीक्षण SIR मोहीम ही एका विशिष्ट पक्षाच्या फायद्याची आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकजुटीने राहण्याचा सल्ला
या यंत्रणेच्या माध्यमातून आपल्याला मिळणारी मतं कमी करण्याचा डाव आखला आहे. यावर आपण वेळीच उपाययोजना करायला हवी, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. याशिवाय, पुढील दोन दिवसांमध्ये बीएलओ नेमण्यात यावेत आणि तत्काळ त्यांचे ट्रेनिंग देखील सुरु करण्यात यावे, अशी गरजही छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकजुटीने राहण्याचा सल्ला दिला.
पक्ष राज्यभर अधिक बळकट करण्याचा निर्धार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकजूट महत्त्वाची असून सर्वांनी एकाच आवाजात बोलले पाहिजे, असा संदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आमदारांना दिला. पक्षाची एकजूट सर्वोच्च आहे, सर्वांनी एकाच भूमिकेतून बोलले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीत सर्वांनी एकमताने ठराव मंजूर करत येणाऱ्या काळात सुनेत्रावहिनी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यभर अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच वहिनी जो निर्णय घेतील, त्यामागे सर्व आमदार, खासदार व पदाधिकारी ठामपणे उभे राहतील, अशी ग्वाही देण्यात आली.












